कागल सीमा नाक्याजवळ अपघातात कणेरीचा तरुण ठार ट्रकची दुचाकीला धडक; धोकादायक वळणांमुळे नागरिकांत संताप

कागल सीमा नाक्याजवळ अपघातात कणेरीचा तरुण ठार
ट्रकची दुचाकीला धडक;
धोकादायक वळणांमुळे नागरिकांत संताप
सिंहवाणी ब्युरो /कागल,
मालवाहू ट्रकने दुचाकीस्वाराला ठोकरल्याने झालेल्या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. विनायक अनिल पाटील (वय ३०, असे त्यांचे नाव आहे. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कागल सीमा तपासणी नाक्याजवळील धोकादायक वळणावर आज दुपारी साडेचार वाजता ही घटना घडली.
विनायक पाटील रा. कणेरी, ता. करवीर)
हे दुचाकीवरून निपाणीच्या दिशेने निघाले होते. यावेळी कागल सीमा तपासणी नाक्याच्या धोकादायक वळणावर मालवाहू ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरात ठोकरले. त्यामुळे विनायक हे ट्रकच्या डाव्या बाजूच्या मागील चाकाखाली सापडले. गंभीर जखमी विनायकला उपचारासाठी नागरिकांनी तातडीने येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. अपघाताची माहिती समजताच कागल पोलिस ठाण्याचे हवालदार बालाजी पाटील आणि हवालदार संतोष भाट यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पोलिसांनी दोन्ही अपघातग्रस्त वाहनांसह ट्रकचालकाला ताब्यात घेतले आहे. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला.
या घटनेमुळे विनायक पाटील यांचे कुटुंब उघड्यावर पडले असून, कणेरी ग्रामस्थांतून संताप व्यक्त केला जात आहे. येथील अपघातांची मालिका थांबणार कधी? असा प्रश्न उपस्थित होत आहे.