शाहू छत्रपतींनी समाजात शांतता, सलोखा निर्माण केला : संयोगिताराजे महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ कोवाड येथे सभा; महिलांची लक्षणीय उपस्थिती
शाहू छत्रपतींनी समाजात शांतता, सलोखा निर्माण केला : संयोगिताराजे
महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ कोवाड येथे सभा; महिलांची लक्षणीय उपस्थिती
सिंहवाणी ब्युरो/चंदगड
ज्या ज्या वेळी विविध जाती-धर्मात तेढ निर्माण होऊन वातावरण कलुषित बनले, त्या त्या वेळी नगरीचे पालक म्हणून शाहू छत्रपती यांनी पुढाकार घेऊन समाजात शांतता व सलोखा निर्माण केला. आजच्या परिस्थितीत अशाच नेतृत्वाची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन युवराज्ञी संयोगिताराजे यांनी केले.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे इंडिया व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारानिमित्त युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांनी चंदगड तालुक्यात गावागावात भेटीगाठी दिल्या. त्यांच्या उपस्थिती कोवाड येथे महिला मेळावा पार पडला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी कोवाड व परिसरातील महिलांनी ‘यावेळी फक्त शाहू छत्रपती’ असा एकमुखी निर्धार केला.
संयोगिताराजे पुढे म्हणाल्या, मराठा आरक्षण चळवळीत संभाजीराजे २००७ पासून राज्यभर संपर्क दौरे करत आहेत. मराठा समाजाच्या मागाण्यांसाठी आझाद मैदानावर त्यांनी आमरण उपोषण केले आणि सहा मागण्या मान्य करून घेतल्या. मनोज जरागे यांच्या गावात उपोषणाला बसलेल्या गावकर्यांवर अमानुष लाठीचार्ज झाला. तेव्हा रातोरात संभाजीराजे कोल्हापूरहून निघाले आणि सराटी अंतरवाली गावात जाऊन पीडितांची भेट घेतली. त्यांना आधार दिला. आमरण उपोषणावेळी स्वतः शाहू छत्रपती यांनी मनोज जरागेंना भेटले. तेव्हा छत्रपतींचा मान म्हणून महाराजांच्या हस्ते ते पाणी प्यायले. २०१९ मध्ये महापूर काळात पूरग्रस्त लोकांना शाहू छत्रपतींनी राहण्याची सोय केली. जनावरांच्या चार्याची सोय केली. इतकेच काय त्या जनावरांचे दूध विकणे शक्य नव्हते म्हणून स्वतः ते सर्व दूध विकत घेतले. संभाजीराजेंनी फेसबुकवरून कोल्हापूर-सांगलीला मदतीसाठी आवाहन केले. तेव्हा ३७० हून अधिक ट्रक धान्य व वस्तूरूपात आले. प्रतिकूल परिस्थितीतही स्वतः संभाजीराजे नौदलाच्या विमानात बसून एनडीआरएफच्या जवानांसोबत दिल्लीहून कोल्हापूरला आले होते. जवानांच्या त्या १२ तुकड्यातील एक तुकडी कोवाड येथे पाठविली होती. ज्या ज्या वेळी संकटे आली त्या त्या वेळी छत्रपती घराणे धावून आले.
कोवाडच्या सरपंच अनिता भोगण म्हणाल्या, शाहू छत्रपतींची उमदेवारी ही विकासापासून वंचित राहिलेल्या सर्वांना उल्हासित करणारी आहे. नारीशक्तीची ताकद शाहू छत्रपतींच्या पाठीशी असून त्यांच्या विजयासाठी महिला घराघरात पोहचतील.
दौलत कारखान्याचे माजी अध्यक्ष गोपाळराव पाटील यांच्या स्नुषा शीतल पाटील व माजी जिल्हा परिषद सदस्य कल्लाापण्णा भोगण यांचीही भाषणे झाली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या सुजाता पाटील, शांताताई जाधव, माजी सरपंच विष्णू आढाव, एम. जे. पाटील, लक्ष्मण मनवाडकर, पांडुरंग जाधव, नारायण कलुकले, विनोद पाटील, रवींद्र पाटील, जे. के. पाटील, अक्षय करंबळकर, सागर पाटील, संतोष गावडे आदीसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
*********