राधानगरी धरण भरतीच्या उंबरठ्यावर; स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कायम; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

राधानगरी धरण भरतीच्या उंबरठ्यावर; स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता
पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कायम; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
राधानगरी / सिंहवाणी ब्युरो :
कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे राधानगरी धरणाच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत असून धरण पूर्ण क्षमतेच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. धरणात सुमारे ९७ टक्के पाणीसाठा झाला असून, पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू आहे. परिस्थिती कायम राहिल्यास धरणाचे स्वयंचलित दरवाजे कोणत्याही क्षणी उघडले जाऊ शकतात.
जलसंपदा विभागाकडून धरणाच्या पाणीपातळीवर सातत्याने लक्ष ठेवले जात असून, नदीपात्रात पाणी सोडण्याचा निर्णय परिस्थितीनुसार घेतला जाणार आहे. त्यामुळे भोगावती नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दरम्यान, राधानगरी, दाजीपूर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून, या पावसामुळे धरणातील जलसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. जिल्ह्यातील इतर प्रमुख धरणांमध्येही समाधानकारक पाणीसाठा होत असून, पंचगंगा नदीच्या पाणीपातळीतही वाढ नोंदवली जात आहे.
प्रशासनाने नदीकाठच्या गावांतील नागरिक, शेतकरी आणि मच्छीमारांना नदीपात्रात जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असेही सांगण्यात आले आहे.
